पंचायत समिती कडून माहिती अधिकाराला केराची टोपली
तब्बल दोन महिन्यानंतर दिले ग्रामपंचायतला आदेश
प्रतिनिधी/सचिन मेश्राम
पंचायत समितीमध्ये कार्यरत एका अभियंत्यांची माहिती मागितली असता जवळपास दोन महिन्यांनी संबंधीत ग्रामसेवकांना माहिती देण्याचा आदेश देण्यात आल्याने पंचायत समितीला माहिती अधिकाराचे वावडे दिसून येत असून सरळसरळ केराची टोपलीच दाखवल्याची भावना व्यक्त होत आहेत.
मारेगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत एका अभियंत्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भैया अंबादास कन्नाके, रा. पहापळ यांनी माहिती अधिकारांतर्गत पंचायत समितीला मागितलेली होती. त्यासंबंधीचा प्रथम अर्ज दि. 15 एप्रिल2021 ला मागितलेली होती. संबंधीत माहिती कायद्यान्वये एक महिन्याच्या आत देने होते. परंतु एक महिना लोटून गेला तरीही पंचायत समितीने या संबंधीत कोणतीही माहिती संबंधीत व्यक्तीला पुरविण्यात आलेली नव्हती. मागितलेली माहिती न मिळाल्याने या व्यक्तीने पुन्हा कायद्याचा आधार घेत माहिती अधिकारांतर्गत अपील दि. 3 जूनला दाखल केले. अपील दाखल होताच पंचायत समिती खडबडून जागी झाली आणि गटविकास अधिकारी यांनी अभियंत्यांशी संबंधीत ग्रामसेवक यांना पत्र दिले. आणि त्याची प्रतिलिपी कन्नाके यांना पाठवून आपण ही माहिती ग्रामसेवक यांच्याकडून घ्यावे अशाप्रकारे पत्र दिले. संबंधीतअभियंत्याकडे कोणकोणत्या ग्रामपंचायत आहेत हे माहीत नसतांना केवळ वेळकाढुपणाने हा उपद्रव केल्याचे भैया कन्नाके यांनी म्हटले असून पंचायत समिती केवळ चालढकलपणा करीत असल्याचा आरोप केलेला आहेत. माहिती अधिकारात मागितलेली माहिती जवळपास दोन महिने होत आली तरी न मिळाल्याने या अभियंत्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची चर्चा सुरू झालेली आहेत.
हाच अभियंता पांढरकवडा येथे कार्यरत असताना तेथील रोजगार हमी योजनेची चौकशी लागली त्यावेळेस पंचायत समिती मधून गायब होते असल्याचेही समोर येत असून पंचायत समिती माहिती देण्यास एवढा उशीर का लावत आहे हे समजण्यापलीकडले असल्याचे मत भैया कन्नाके यांनी व्यक्त केले आहे.
अधिकाऱ्यांनी केली धूळफेक
भैय्या कन्नाके यांनी अपील केल्यानंतर बी डी ओ यांनी त्यांना सुनावणीस बोलावलेले होते. त्यावेळी काही ग्रामसेवक उपस्थित होते. उमाटे या अभियंत्याकडे मार्डी व कुंभा या दोन पंचायत समिती गणांचा कारभार असून सुनावणीदरम्यान बोटोनी व वेगाव या गणातील ग्रामसेवक उपस्थित होते. तसेच यावेळी काही ग्रामसेवकांनी आमच्या ग्रामपंचायत मध्ये या अभियंत्यांची कोणत्याही प्रकारची कामे नसल्याचे लिहून दिले. परंतु हे सगळे ग्रामसेवक दुसऱ्या विभागातील असल्याने केवळ सुनावणीच्या नावाखाली धूळफेक केली असे मत भैय्या कन्नाके यांनी व्यक्त केले आहे. याविरोधात आता अमरावती येथे अपील दाखल करणार असल्याचेही सांगितले.