आरक्षण वाचवण्यासाठी बिरसा फायटर्स उतरली रस्त्यावर,आझाद मैदान मुंबई येथे काढला पहिला मोर्चा
रत्नागिरी:आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र आयोजित आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्स सामिल होऊन आक्रोश मोर्चा केला.आजाद मैदान मुंबई ते मंत्रालय मुंबई असा हा मोर्चा आयोजन करण्यात आला होता. मोर्चात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या जाती,विमुक्त जमाती,विशेष मागास प्रवर्ग व ओबीसी समाजाच्या संघटना एकवटल्या होत्या.
या मोर्चात बिरसा फायटर्स संघटना पदाधिकारी यांनी जोरात घोषणाबाजी केली. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे!, कोण म्हणतो देणार नाय,घेतल्याशिवाय राहणार नाय!,लढेंगे जितेंगे!,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!, बिरसा मुंडा की जय!,जय बिरसा!जय आदिवासी! जय जोहार !जय संविधान! अशा घोषणा देण्यात आल्या. उलगुलान जारी है और जारी रहेगा! हा बिरसा फायटर्सचा नारासुद्धा देण्यात आला.बिरसा फायटर्स ही आदिवासी समाजाची एक नवीन सामाजिक संघटना असून 2-4 दिवसांपूर्वीच स्थापन करण्यात आली होती.आझाद मैदान मुंबई येथे प्रत्यक्षात मैदानावरच्या लढाईत उतरून बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी आम्ही लढाऊ वृत्तीचे आहोत हे दाखवून दिले आहे. आम्ही संविधानवादी अशा टोप्या बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी डोक्यावर घातल्या होत्या.घोषणाबाजीने संपूर्ण आझाद मैदान परिसर बिरसा फायटर्सने दणाणून सोडला.
समस्त अनुसूचित जाती, जमाती ,भटक्या जाती,विमुक्त जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या संघटना संविधानिक हक्क व आरक्षण सुरूच ठेवण्याच्या मागणीसाठी दिनांक 26 जून 2021 रोजी राज्यभर मोर्चाचे आयोजन केले होते.यात बिरसा फायटर्स संघटनेने राज्यभर ठिकठिकाणी निवेदन दिली.
निवेदनात म्हटले आहे की,आज दिनांक 26 जून 2021 रोजी आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र आयोजित आक्रोश मोर्चा महाराष्ट्रभर आयोजित केला आहे. सदर मोर्च्यास आमच्या बिरसा फायटर्स संघटनेचा जाहीर पाठिंबा असून समस्त अनुसूचित जाती,जमाती,भटक्या जाती,विमुक्त जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाचे संविधानिक हक्क व आरक्षण सुरूच ठेवण्याबाबतच्या मागण्या आम्ही निवेदना सोबत जोडत आहोत.
पदोन्नतीतील आरक्षण बंद,शिष्यवृत्ती/फ्रीशीप बंद,खाजगीकरण,कंत्राटीकरण,कामगार हिताचे 44 कायदे रद्द,नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षण बंद,ओबीसींना पदोन्नतीत व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण,शेतकरी विरोधी कायदे,अन्याय अत्याचारामध्ये वाढ,कोरोना काळात मोफत रेशन,कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी,बारा बलुतेदारांना आर्थिक सहाय्य इत्यादी विषयांवर आक्रोश मोर्चा आहे. मोर्चासंबंधीत आमच्या बिरसा फायटर्स संघटनेच्या मागण्यांबाबत गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी. हीच नम्र विनंती आहे. अन्यथा मागासवर्गीय समाजातर्फे आणखीन तीव्र मोर्चा/आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.असा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा सुशीलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी शासनाला दिला आहे.
या आक्रोश मोर्चात सुशीलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स,महाराष्ट्र राज्य संघटक ज्ञानेश्वर बर्डे, बिरसा फायटर्स पदाधिकारी मच्छिंद्र सोनवणे,रविंद्र गायकवाड ,भिमा साळुंखे, दिपक माळी ,उमाजी पवार , रविद्र सोनवणे,महेश पवार,महेश जाधव,श्याम पवार,राम पवार,सुरेश पावरा,दामू पावरा,रमेश रावताळे,राजू भिल,दामोदर पावरा,राजू कोकणी,महेश तडवी,श्रीम.सुनंदा पवार इत्यादी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सामिल झाले होते.