कारच्या भीषण अपघातात दोघे ठार
चालकाचा घटनास्थळी मुत्यु तर चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू; चार जण गंभीर
यशोदा नदी पुलावरील घटना
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन
वर्धा - देवळी येथील यशोदा नदी पुला समोरील रपट्यावरून उसळून कार बाजूच्या भींतीवर धडकल्याने झालेल्या अपघातात कार चालक राहुल पोहोरे जागीच ठार झाला तर शर्मिष्ठा पोहोरे (८) चा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सावंगी येथे उपचार सुरू आहेत.
या माहितीनुसार रुपनगर, वडगाव जि. यवतमाळ येथील पोहरे कुटुंबातील सहा जण एम. एच. ३८-१९८० या क्रमांकाच्या मारुती अल्टो कारने यवतमाळवरून वर्धेकडे जात होते. यशोदा पुलाजवळ कार अनियंत्रित होऊन प्रथम दुभाजकावर चढली नंतर अंदोरीकडे जाणार्या रपट्याच्या भिंतीला जोरदार धडक दिली. यात कारचालक राहुल दिलीप पोहरे (३७) हे घटनास्थळीच ठार झाले. कारमधील स्मिता पोहरे, शर्मिष्ठा पोहरे, आरती पोहरे आणि अद्विक पोहरे जखमी झाले. जखमींवर देवळी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून सावंगी रुग्णालयात हलविले. दरम्यान, सावंगी येथे उपचार सुरू असताना चिमुकली शर्मिष्ठाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या भीषण अपघातामुळे नागपूर -तुळजापूर या चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी खोळंबली होती. अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.