शेतकऱ्यांनी घेतला गळफास अन प्रकल्पाच्या कामाला मिळाला स्टॉप
🔸️प्रशासनाची उडाली पुरती भंबेरी
🔸️हटवांजरी येथील जमिनीचा मोबदला प्रकरणाला वेगळे वळण
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील हटवांजरी , सराटी शिवारात सिंचन प्रकल्प उभारण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले .मात्र अधिग्रहीत जमिनीचा मोबदला मिळण्यापूर्वीच खोदकाम करण्याच्या मनसुब्यावर चक्क पिडीत शेतकऱ्यांनी सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची पुरती भंबेरी उडून समोरील काम थांबविण्यास तूर्तास यश आले.तालुक्यात खळबळ उडवून देणारा प्रकार हटवांजरी येथे शुक्रवारच्या रात्री घडला.
तालुक्यातील सराटी , हटवांजरी शिवारात तेरा वर्षांपूर्वी सिंचन विभागाने प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.यात येथील किमान २४ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरेदी करीत अधिग्रहीत करण्यात आल्या.यातील केवळ सहा जणांना नव्या निकषानुसार चौपट पटीने नुकसान भरपाई अदा करण्यात आली.उर्वरित शेतकऱ्यांची जमीन तोडक्या दरात खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पिडीत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली.
सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना जिल्हा सिंचन प्रशासनाने शुक्रवारला थेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू करताच पहातापहाता दोन शेतकऱ्याने चक्क गळफास लावला आणि उपस्थितात आरडाओरड होताच ग्रामस्थांच्या समयसुचकतेने समोरील अनर्थ टळला.या घटनेने प्रशासनात कमालीची भंबेरी उडून ग्रामस्थांत प्रचंड संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
चिघळत असलेल्या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी घटनास्थळी भेट देत सदरील प्रकरण शासन दरबारी मांडण्यात येऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वस्थ केले.तूर्तास प्रकरणावर पडदा पडला असला तरी प्रशासनाच्या बेताल भूमिकेवर शेतकऱ्यांच्या मनात असंतोषाची भावना खदखदत आहे.