पाण्याच्या भीषण समस्येने चिंचमंडळवासी मेटाकुटीला
🔸गावकरी कावडी ने भागविताहेत तहान
🔸सरपंच , उपसरपंच यांचे हात वर
🔸प्रशासनाच्या तकलादू धोरणाचा परिपाक
🔸ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
मारेगाव : प्रतिनिधी
उन्हाची दाहकता कायम असतांना स्थानिक प्रशासनाच्या बेताल भूमिकेने मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. पाच दशकपूर्वीची समस्या आजतागायत कायम असतांना येथील नागरिकांना कावडी चा आधार घ्यावा लागत आहे. सरपंच , उपसरपंच या मूलभूत गरजेचेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.तालुका प्रशासनही तोंडात बोटे घालून असल्याने येथील नागरिक पाण्यासाठी पुरता मेटाकुटीस आला आहे.
तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या चिंचमंडळ येथे पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे.वर्धा नदीत असलेल्या जम्बो विहिरीतुन गावात पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र हा पुरवठा तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आल्याने गावातील पाणी येणे मागील काही दिवसांपासून बंद झाला आहे.त्यामुळे पाणी समस्या उग्र झाली असून त्याची झळ येथील नागरिकांना सोसावी लागत आहे.
दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणाने तोडक्या पाणी पुरवठ्यात कावडी च्या सहाय्याने येथील नागरिक आपली तृष्णा भागवित असल्याचे विदारक वास्तव आहे.अवघ्या दिवसात पाणी समस्येवर तोडगा निघाला नाहीतर जनता आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
वारंवार होणार खंडीत होणारा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र रोहित्र नसल्याने गावातील पाणी समस्या बिकट झाली आहे.यासाठी लागणारा खर्च अवाढव्य आहे.तालुका प्रशासनाकडून कोणताही निधी अथवा तरतूद नसल्याने गावपातळीवर वीस लाखाच्या आसपास असलेला थकीत कर नागरिकांनी प्रदान केल्यास ही समस्या निकालात काढता येईल.त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे ही प्रामाणिक अपेक्षा आहे.
वैशाली परचाके
सरपंच
ग्रा.पं. चिंचमंडळ