चिमुकल्या वयात मातृपितृ हरपले..अन लालसरे दाम्पत्यांनी तीचे चतुर्भूज केले..!
- पेंढरी नजीक तान्हा पोड येथे पार पडले शुभमंगलम सावधान
मारेगाव : दीपक डोहणे
तिच्या बालपणी मातृपितृचं छत्र हरविलेल.तिच्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरु असतांना तिच्या समोर शुन्यच दिसत होते.लहानगे भाऊ त्यातच सोबतीला वार्धक्यात बुडालेले आजी आजोबा.जगाव कसं.जबाबदारी कशी पेलावी. या प्रश्नाने मनात कालवाकालव व्हायची.दिवसागणिक प्रत्येक दिवसाचा सुर्य मावळत असतांना वयाची एकवीशी गाठली.हाताला काम नाही.लॉकडाऊन मुळे आर्थिक चटके बसत असतांना तिच्या साठी स्थळ आलय आणी बोटोणी येथील सामाजिक व मानवतेची जाणीव असलेले लालसरे दांपत्य पुढे सरसावले.लग्नाचा संपुर्ण खर्च उचलत या निरागस किंबहुना अनाथ सदृश स्थितीत असलेल्या मुलीचे दि.२१ मे शुक्रवारला शुभमंगलम सावधान केले.हा भावनाविवश सोहळा तालुक्यातील पेंढरी नजीक असलेल्या तान्हा पोड येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत सुसंपन्न झाला.
शंभर टक्के आदिवासी बहुल असलेल्या पेंढरी नजीकच्या तान्हा पोड येथील निरागस असलेली सुचिता ही अवघी पाच वर्षाची असतांना वडीलाने कीटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.हाच धसका घेत कालांतराने आईलाही आजाराने पछाडले.आणि आजारपणात आईचाही मृत्यू झाला.चिमुकल्या वयातच तीचं मातृपितृ छत्र हरपले.घरात वार्धक्यात असलेले आजी ,आजोबा व लहानगे भाऊ.त्यामुळे आपले भविष्य काय या चिंतेने तिच्या मनाची त्रेधातीरपट उडत होती.सुचिता हिला स्थळ येवू लागली.मात्र आपणास कोणीच नाही.जवळ दमडी नाही या चिंतेची भर पडु लागली.निरागस असलेल्या सुचिता हिला देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात ना.या उक्तीप्रमाने बोटोणी येथील भाजपचे सरचिटणीस शंकर लालसरे व पंचायत समिती सदस्या सुनिता लालसरे यांनी तिची विदारक स्थिती पाहून मायेची उब दिली.नव्हेतर मायेचा पदर तिच्या डोक्यावर ठेवून संपुर्ण खर्चासहित लग्न करवून देण्याचा मानवतावादी विचार अमलात आणला आणि शुक्रवारला तीचा विवाह थाटात पार पाडून सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.यावेळी शंकर लालसरे,पं.स.सदस्या सुनिता लालसरे, बोटोणी येथील सरपंच सुनिता जुमनाके,विनोद जुमनाके,चेतन बहादूरे यांच्यासह निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.
सुचिता या निरागस मुलीचा लग्न सोहळा शांततेत ,संचारबंदीचे काटेकोर पालन करित अगदी नेटकेपणाने पार पाडण्यासाठी येथील सरपंच रामा कुमरे यांनी अथक परिश्रम घेत अनोखी जबाबदारी पार पाडली.सुचिता हिचे मातृपितृ छाया हरविले असतांना केळापूर तालुक्यातील खैरी येथील रमेश आत्राम या मुलाने मोठेपणा दाखवित लग्नाला होकार देत कोलाम समाजाच्या पद्धतीने हा सोहळा पार पडला.येथील लग्नाचे पुर्ण सोपस्कार पाडले गेले.अलीकडे सर्वांना बसत असलेल्या आर्थिक झळा.महामारीचा प्रकोप असतांना हायटेक जमान्यात बदलत चाललेली मानवाची स्वार्थी प्रवृत्ती व लोभाला मिळालेली भित्रेपणाची जोड असतांना मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील शंकर व सुनिता लालसरे या दाम्पत्यांनी सुचिता हिचे हात पिवळे करुन तिच्या आयुष्याला वेगळे वळण देत सुगंध दिला आहे.या अनाकलनीय प्रसंगाने लालसरे दाम्पत्यांच्या मानवतावादी प्रेरणेतुन माणसांना मानुसकीतील माणूसपण कळेल काय? हा प्रश्न मात्र येथे अनुत्तरीत आहे.