आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये विमा संरक्षण द्या: सुशिलकुमार पावरा यांची मागणी
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी :रत्नागिरी
रत्नागिरी: महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचा-यांना५० लाख रूपये विमा संरक्षण द्या. अशी मागणी सुशिलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राच्या मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी५० लाख रूपये विमा संरक्षण योजना जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रम शाळेतील कोरोना कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी यांनाही ५० लाख रूपये विमा संरक्षण योजना लागू करण्यात यावी. राज्य शासनाच्या आदिवासी आश्रम शाळेतील ५३ कर्मचारी यांचा कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. अशी बातमी वृत्तपत्रात व पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. खावटी योजनेच्या कामामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे या कर्मचा-यांचा मृत्यू झाला असा आरोप शिक्षकांनी व कुटुंबियांनी केला आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत विदारक रुप धारण केलेले आहे. अनेकांना वेगाने कोरोनाचा संसर्ग होत आहे. महाराष्ट्र राज्यात मृत्यदर वाढतच आहे. यात आदिवासी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार प्रकल्पातर्गत येणाऱ्या एकूण ११ आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचारी यांचा समावेश आहे. यात शिक्षक व मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. खावटी योजनेच्या कामासाठी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यानी लाभार्थीपर्यंत जावे लागले. तसेच इतर कामासाठी ही लोकांपर्यंत जावे लागते.साहजिकच लोकांशी संपर्क होऊन कोरोनाची लागण होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या कामांत कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहेस. म्हणूनच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांना ५० लाख रूपये कोरोना विमा संरक्षण योजना जाहीर केली त्याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये विमा संरक्षण देण्याची मागणी सुशिलकुमार पावरा यांनी शासनाकडे केली आहे.